Leave a message for Author

If you want to leave a message regarding with any content, your may convey here...

Monday, 14 July 2014

विरत गेलेली चाहूल....

                                                                                        Dainik Ganvkari, Nasik May 2010.

     फार अस्वस्थ  वाटतंय, ढगाळलेल्या वातावरणात वादळ सुटलं कि असंच वाटतं. खरं तर याच वातावरणात लहानपणी खूप मौज वाटायची, आज मात्र हूर हूर वाटते. घडून गेलेल्या अन अर्धवट घडलेल्या  घटना, भेटलेली माणसं, जिवलग दोस्त आणि चाहते सुद्धा... डोळ्यांसमोरून तरळून जातात. आई-बाबा अन भावंडही दिसतात. लहानपणातल्या  माझ्या खोडकरपणाला काठीचा धाक दाखवणारी आजीही दिसून जाते.. अंगाई गाणा-या आईचा कंठ दाटून आल्यासारखा वाटतो.., तर लपंडाव खेळताना अंगणात धावणारे आम्ही पोरंही नकळत दिसून जातो...तेव्हा खेळता खेळता दिवसभराचा एक तास झाल्यासारखा वाटायचा, आता एकच तास दिवस भराहून मोठा वाटतो. सर्वांच्या आठवणीने व्याकुळ करून सोडणारी ही वेळ संपत का नाही लवकर ? म्हणून मी उगाच एका टेकडीवर मावळत्या सूर्याच्या उन्हाचा आस्वाद घेत बसलोय.. 
      आज तब्बल आठ वर्षांनंतरचा मायभूमीतला  सूर्यास्त मी पाहतोय. नेमके सायंकाळ म्हणावं की कातरवेळ ? या विचारांतच मी अस्वस्थ आहे. ते अल्लडपणाचे दिवस कधीच संपलेत. अर्ध्या तपात महाराष्ट्रातली बहुतांशी ठिकाणं फिरून झाली..पण; इतक्या दिवसांत असा सूर्यास्त एकही पाहायला मिळाला नाही. जे पाहिलं ते मोहात पाडणारं अन कित्तेकदा तर सोडूच नये असं वाटणारं होतं. खरच काहीसा वादळी वाटणारा आजचा हा सूर्यास्त वंदनीय आहे...चला पाहता पाहता  आठवणींचा एक पट डोळ्यांसमोरून तरळून गेला. भोवतालच्या झाडांवर पक्ष्यांचा किलबिलाट सुरु झाला. ढग भरून आलंय...ज्या सुर्यास्ताबद्दल मी बोलत होतो..तो कधीच ढगाआड गेला; पण मावळला नसेल अजून. गावाच्या उत्तरेला गोदावरी नदी आहे, त्या बाजूने वादळाने जोर धरला. गवताचे ओझे चा-याच्या पेंढ्या डोक्यावर घेऊन घराकडे परतणारे वादळाशी झुंज देऊ लागले. अचानक पाऊस येतो की काय? या भीतीने काहींची आवरा-आवर सुरु झाली. मोठ्यांना वादळात होणा-या नुकसानीची धास्ती तर लहानग्यांना ऊन जाऊन सावलीत खेळायला मिळाल्याचा आनंद... गावाच्या पूर्वेकडून गायी-म्हशींचा मोठा कळप गावाकडे परतताना दिसतो. त्यातच काही शेळ्यांचं ओरडणं सायंकाळच्या अस्वस्थतेत भर घालीत मनाला डिवचून जातं. दूरवर  कोठेतरी एक आई आपल्या लाडक्याला हाक मारते, इतक्यात नळाला पाणी आलंय. चार-दोन म्हाता-यांसोबत पोरांची नळावर जमलेली गर्दी-अशांततेत आणखी भर! गावाच्या मध्यभागी एका पडक्या इमारतीजवळ दोन पोरं चोरून सिगारेटचा झुरका मारतात. समोरच्या उंच, थोरल्या पिंपळाच्या झाडावर एक घरटं आनंदानं डोलतंय..'आता कोसळायचंच  तर दुख मानून काय घेणार?, तेव्हा आनंदातच कोसळू या.' असंच कदाचित ते म्हणत असेल.पण पक्षी मात्र बेफिकीर, बिनधास्त. पक्षीच काय त्यांची घरटीही आता शौर्य दाखवायला लागली..म्हणून वाटतं - 'पक्षी उडतात ते बुलंद झेप घेऊनच..मागे कधी परतायचं याचा ते विचार करीत नाहीत, कारण त्यांचा विश्वास असतो आपल्या पंखांवर आणि त्यांच्यात असते जिद्द..प्रत्येक फांदीवर, प्रत्येक झाडावर..नवं घरटं उभारण्याची!' खरंच किती श्रीमंत आहे हा निसर्ग! आपलं उदात्त वैभव उधळून देतानाच त्याची निर्मितीही त्याने त्यातूनच साधलेली असते..अन पाखरं तरी कशी, आपला सोबती म्हणून निसर्गाला सारं काही माफ करीत ते पुन्हा मैलोनमैल भटकत असतात... छे! क्षितिजात विहार करतानाच त्यांचं मन क्षितीजाहून मोठं झालेलं असतं.
     दोस्तांनो..,वादळ आनं अन गेलंही.... या वादळात मातीचा कण अन कण सामील झाला. त्याला पाहून 'हेच वादळ आगामी मान्सूनची चाहूल तर नसेल ना!'  असं वाटल्यानं  बळीराजा थोडा गहिवरला, थोडा सुखावलाही असेल;..पाहता पाहता आकाशाच्या कडा काळोखात विरघळल्या..सायंकाळ की कातरवेळ हे समजण्याआधीच ती वेळ पश्चिम क्षितिजावर निद्रिस्त झाली....!

Saturday, 12 July 2014

मनाच्या गाभा-यातून...



 Dainik Lokmat,Ahmednagar August 2014 
      
      खिडकीतून थंडगार हवेचा झोत आल्यानं अचानक जाग आली. रात्रीचे दोन वाजले - गाडीनं नुकतंच सातारा शहर मागे टाकलं होतं. रस्त्यावर कोसळणारा पाऊस छेदत गाडी बेफाम वेगानं कोल्हापूरकडे निघाली. पावसाचा गारवा थोडा त्रासदायक वाटल्यानं मी खिडकी अर्धवट बंद केली...रात्रीच्या मध्यान्ह काळोखात  पाऊस चांगलाच रमला होता...अन रात्रही भिजकी होत त्याला साद घालत होती...
          बागेतल्या नुकत्याच उमलणा-या कळीवर एखाद्या फुलपाखरानं अलगद येउन बसल्याची जाणीव व्हावी तसाच एक विचार मनात आला- कुणाशीतरी मनसोक्त बोलावं या पावसाबद्दल ! पण दुस-याच क्षणाला जाणीव झाली या मध्यान्ह रात्री नेमके कुणाशी बोलणार आपण ?  कॉल करावं म्हटलं तरी हि वेळ योग्य नव्हती.अन खरं म्हणजे प्रश्न वेळेचा नव्हताच..प्रश्न होता बोलण्याचा...! हल्ली या जगात मनसोक्त असं बोलतच नाही कुणी ! कधीच नाही..मग ती वेळ मध्यान्ह रात्र असो कि गजबजलेल्या वाटेनं सरकत सरकत मावळणारा दिवसही ! खूपच ब्युझी झालोत आम्ही काहीतरी कमावण्यात...पैसा, स्टेटस..आणि  बरंच काही न सांगण्यासारखं. मला इतकंच आठवलं - रात्री एस.टी.त बसल्यावर गाणं गुणगुणत नगर शहर सोडलं होतं...पण आता याच वाटेवर पाऊस भेटल्यानं मोह होत होता कुणाशीतरी बोलण्याचा. क्षणभर एक अजब गोष्ट मनात आली कि, स्वतःच स्वतःला  कॉल करावा अन केलाही पण व्यस्त असल्याचं सांगितलं..खरंच यार..किती अजब गोष्ट आहे ना ! आपण कुणाचाही नंबर डायल करू शकतो हवं तर पण स्वतःचा नंबर नेहमीच व्यस्त असतो स्वतःसाठी..म्हणजे जगात कुणाशीही आपण बोलू शकतो पण स्वतःशी कधी बोलायचं म्हटलं तर...? किती मार्मिक वाटतोय हा क्षण मला ! मी ठरवलं आता स्वतःशीच बोलायचं फक्त....
      अर्धवट झोपेत असताना कुणीतरी शेजारी येउन निजावं तशी एक - एक आठवण येऊ लागली मनात...मग आठवत गेलं त्या झिम्माड पावसात भिजत-भिजत वाहिलेलं अल्लड बालपण...चिखल होऊन पायाशी दरवळलेल्या मातीचा सुवास..थोड्याश्याच पावसानं भिजकी होणारी पण तितकीच घट्ट असलेली मातीची घरं..घरांचं अंगण..अंगणातली वाळू ...पाखरांची घरटी..तुटलेली..तुटणारी...पुन्हा फांदीवर डोलताना दिसणारी..मध्येच कधीतरी शहाणपण शिकवणारी शाळा ..मास्तर...शाळेतले दोस्त...खेळण्यापेक्षा भांडणंच जास्त पण मनातून अखंड प्रेम करायला शिकवणारे ते दिवस..आठवत गेला तो ग्रीष्म..आषाढ..अन श्रावणही - साज-या केलेल्या उत्सवांसोबत ! एखाद्या सुवासिनीने वारुळाला पुजावं तसं 'शिकून मोठा साहेब हो' म्हणत तोंडावरून मायेचा हात फिरवणारी म्हातारी माणसं अन खरोखर मोठं होण्याच्या खुळचट ओढीनं झपझप चालत शाळा - कॉलेज-नोकरीपर्यंत पोचलेलो आपण ! ....आठवत राहिलं पहिलं लेक्चर...पहिली कविता..पहिलं प्रेम..पहिलं ऑफिस ...ऑफिसातली खिडकी अन खिडकीबाहेर कोसळत असलेला धो -धो पाऊस ! तसाच बोलत राहिलो आठवणींसोबत.....भिजण्याची ओढ असतानाही भिजू शकत नव्हतो..अन बोलण्याची इच्छा असतानाही गप्प राहिलेला मी...!
      खरं म्हणजे या आठवणींच्या रुपानं बोलतच राहिलं आयुष्य तेव्हा...! अन आपल्याच आयुष्यानं आपल्याशी बोलावं असा अफलातून क्षण मिळणार तरी केव्हा..? फारच दुर्मिळ ! कारण आम्ही गुंतत चाललोय - टी.व्ही., इंटरनेट अन फेसबुकच्या जाळ्यात. होय आम्ही तासंतास चाटिंग करतो समोर कोण आहे हे माहित नसलेल्या, कदाचित फेक असलेल्या अकौंटशी! पण आम्ही कधीच बोलत नाही स्वतःशी. तासंतास ...दिवसेंदिवस..अन वर्षानुवर्षे..आमची आमच्याशीच नसते होत गाठ-भेट...म्हणूनच आम्ही नाही गाऊ शकत स्वच्छंदी पाखरांसारखं..नाही बागडू शकत मोरांसारखं आभाळ भरून आल्यावरही...शरीराला खूप सुखं दिलीत पण मनाला आम्ही कधीच विचारलं नाही- तुला काय हवंय म्हणून ? कधी कधी वाटतं दुसर्याशी बोलण्यासाठी नेटवर्क शोधत खूप दूर गेलो आपण..पण स्वतः पर्यंत पोहोचायचं राहूनच गेलं....!
        पहाटेच्या धुसर - तांबड्या प्रकाशात दोन पाखरं उडताना दिसली...माझी हिरकणी..आता हिरव्यागर्द कोल्हापूर शहरात येउन थबकली होती...भोवताली रस्त्यावरची गर्दी पाहून क्षणभर  वाटलं..आपल्या आतही  अश्या अनेक चेहऱ्यांची गर्दी असते ना! फरक इतकाच कि आपण त्यांना ओळखत नसतो..कारण ते चेहरे असतात आपल्या...चंचल...बाव-या..अबोल कधी बोलक्या मनाचे ..!
                                                                                                                - कृष्णा बेलगांवकर


      




                                                                                        
                                                                                     

Thursday, 3 July 2014

"आठवणीतला भिजपाऊस....."

                                            
                                                                       Dainik Lokmat, Ahmednagar, August 2014
      
      सहज डायरीचं पान उलटलं - निरव शांततेत अचानक कसलातरी आवाज व्हावा अन भयभीत पाखरांनी मिळेल त्या दिशेला झेप घेऊन पळावं, तसे अनेक क्षण डोळ्यांसमोर तरळले ...थोडे गतकाळातले -घडून गेलेले ; थोडे आजही घडत राहिलेले...! ती ग्रीष्मातली सकाळ...चिंब भिजलेलं शहर...रस्त्यावरची गर्दी...रिक्षाचे हॉर्न...चौकातले पोलिस...रस्त्यालगतची चहाची दुकानं...त्याच भिजक्या वाटेवर अलगद पावलं टाकत कॉलेजला येणारी पोरी - पोरं...अन एखाद्या सौंदर्यवतीनं लाजून बसावं, तसंच  हिरव्यागर्द झाडीत दडून बसलेलं 'न्यू आर्ट्स कोलेज'...!
      पत्रकारितेच्या निमित्तानं शहरात आलो अन कॉलेजशी  नातं जोडलं गेलं. मनात नसतानाही एम.एस्सी.ला प्रवेश घेतला अन प्रवासाची वाटच बदलली. ऑफिसमधल्या सहका-यांऐवजी भोवताली मित्र-मैत्रीणींचं वर्तुळ वाढत गेलं. मग एखाद्या तरुण कवीनं शीळ वाजवत बागेत फिरावं तसंच कॉलेजला यायचो मी. नवी - कोरी हर्कुलीस होतीच सोबत. एखाद्या वादळानंतर सूर्यानं पूर्वेकडून उगनंच सोडून द्यावं, तसा कधीही-कुठूनही यायचो मी कॉलेजात! ' सारे रस्ते आपल्याच बापाचे ' असं तेव्हा मनात नव्हतं, तेव्हढंच आता बरं वाटतं. सकाळीच विशाल गणपतीला  जायचं, अन कॉलेज सुटल्यावर नाटकाच्या रिहर्सलला ...कधी कधी आकाशवाणीलाही बडबड करायची, याशिवाय शहरातली सांस्कृतिक चळवळ , गणेशोत्सव , नवरात्र आणि  उरल्या वेळेत 'कॉलेज कट्टा !' खरं म्हणजे 'राजकारण' सोडलं तर सारंच भावलं या शहरातलं...अन सगळ्यांत जास्त भावला तो धो - धो कोसळणारा भिजपाऊस !
      कधी कधी दिवसभर आभाळ झाकोळून यायचं अन कुढत बसलेल्या तानुल्या पोरानं एकाएकी खुदकन हसावं तसा अचानक तो सुरु व्हायचा ...कॉलेज समोरचं भलं-थोरलं गुलमोहोराचं झाड मनसोक्त अन रुबाबात न्हाताना दिसायचं. मग पुन्हा निघायचो मी रेंजर सायकल घेऊन त्या पावसात फेरफटका मारायला..चितळे रोड , कापड बाजार, नगर कॉलेज,चांदणे चौक , डी.एस. पी. ते पत्रकार चौक. छे! पोलिसमामासुद्धा नाद करायचे नाहीत-सायकल कशाला अडवतील ते? मग जायचं वस्तीगृहात, अंघोळ करून कपडे बदलायचे, तितक्यात मैत्रिणीचा फोन - 'गरम-गरम भजे खायला जायचं'. याची आपली रिमझिम चालूच..कॉलेज समोरची रंगी-बेरंगी पोरांनी  गजबजलेली  कॅन्टीन ..भज्यांचा खमंग सुवास...दोघांत एक प्लेट मुद्दामहुन मागवायची..! अरे आजही नाद नाही त्या भज्यांचा...चहाचा तर मोहच सुटत नाही. मग पुन्हा धो-धो पाऊस...माझ्या काळजीनं तिनं आणलेली एकुलती एक छत्री. पण मला छत्री नाही, पाऊस आवडतो..छत्री बंद..पाऊस चालू..दोघेही ओलेचिंब ....सोबत भिजलेलं शहर...भिजलेले रस्ते...झाडाखाली पाऊस चोरून थांबलेली आम्हाला पाहणारी गर्दी...अन जणू फक्त आमच्यासाठीच कोसळत राहणारा आमचा जिवलग... भिजपाऊस !
    क्षणात डायरी बंद केली- गतकाळातला भिजपाऊस डोळ्यांतून पाझरला आज. तेव्हाचे भिजलेले रस्ते...भिजलेलं शहर...अन भिजलेले कपडे..सारं सुकून गेलं असेल पण त्या आठवणी? - आजही भिजक्याच आहेत त्या ! मनाच्या खोल जलाशयात तरंगणाऱ्या त्या आठवणींचं कधी गोठून शिंपलं तरी का होऊ नये?
     कॉलेज सोडलं, त्यानंतर शहरच सोडलं...तो 'जिवलग' पुन्हा भेटलाच नाही कधी.....!

                                                                                                                         - कृष्णा बेलगांवकर