Leave a message for Author

If you want to leave a message regarding with any content, your may convey here...

Thursday, 14 January 2021

हा अट्टहास कशासाठी ...?

सण-उत्सव येतात जातात, पण या निमित्ताने माणसं खरोखर एकमेकांना माफ करतात का? राजकीय द्वेषातून निर्माण झालेल्या वैमनस्याचे लोळ अनेक माणसांच्या घरापर्यंत जाताना मी पहिली आहेत. त्या घरात असलेल्या निरपराध माणसाचंही जगणं उध्वस्त होताना, होरपळताना मी पाहिलं आहे. इतकंच नाही, हल्ली माणूस ही जमातच फार निष्ठुर होत आहे. माणसं माणसाला सहन होत नाहीयत. कुटुंबात होणारी जरासी कुरबुर सहन होत नाही म्हणून विवाहबाह्य संबंध ठेवण्यावर जावून पोहोचला हा समाज. मग फक्त एक दिवस ‘गोड बोलण्याचे’ हे सगळे बहाणे आणि अट्टहास कशासाठी? खरोखर वर्षातून एकदाच येणाऱ्या दसरा, मकरसंक्रांतीसारख्या अशा सणांच्या निमित्ताने मागचं विसरून पुढे चालता आलं असतं तर अलीकडे उध्वस्त होत चाललेली कितीतरी कुटुंब वाचली असती. इतकंच नाही, पण या देशात अगदी गुन्हेगारीचं प्रमाण देखील शून्य राहिलं असतं ...

---------------------------------------------------------------------------------------------------------------------------

    परवा सायंकाळी Tagline साठी एका जाहिरात एजन्सीचा कॉल आला. अर्थात Product काय आहे ,असं विचारून मी जरा वेळात त्यांना Tagline ईमेल केली- ‘चला तोंड गोड करू’. मकर संक्रांतीच्या सणाचं औचित्य असल्याने Product ला साजेशी वाटेल म्हणून मी ती सुचवली. काल त्या एजन्सीचा पुन्हा कॉल आला - आपण दिलेली Tagline आवडल्याचं कळवलं. मी सुखावलो, थोडं बरं वाटलं.

      जाहिरात, संज्ञापन आणि मनोरंजन क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून करत असलेल्या लेखनाचे असे बरेच अनुभव येत आहेत. पण माझा मूळ पिंड ललित लेखनाचा आहे. निसर्ग, माणूस,मैत्री, प्रेम, कला-संस्कृती, विज्ञान आणि कधी कधी अगदी अध्यात्म देखील माझ्या लेखनाचा विषय होऊन जातं. हे सगळं करताना अचानक एख्याद्या जाहिरातीचं स्क्रिप्ट लिहायला येतं. तर कधी एखाद्या संक्स्कृतीक कार्यक्रमासाठी स्कीट हवंय म्हणून फोन येतो. अलीकडे पुरस्कार सोहळ्यात दिल्या जाणाऱ्या सन्मानपत्राचंही लेखन आवडीने करतो.  हळू हळू आता हा माझा व्यवसाय बनत गेला. पण तरीही मन रमतं ते कथा,कविता आणि कादंबरीतच. का कुणास ठावूक? पण मनाला भावणाऱ्याच गोष्टी जास्त लिहिल्या जातात. कालच्या tagline चं तसंच झालं. मी लिहून दिली, त्या product ची जाहिरातही झाली खरी. पण ज्या सणाचं औचित्य होतं ते पाहता, खरोखर हा गोडवा इतक्या सहज मिळतो का? असा विचार मनात येवून गेला. काल दिवसभर वेगवेगळ्या कामाच्या निमित्ताने बाहेर जावून आलो. नेहमीसारखेच चित्र पाहायला मिळाले. विशेष करून अनेकदा सोशल मिडीयावर, तसंच वृत्तपत्रातून मांजा न वापरण्याचं आवाहन करूनही मांजा घेत लहान मुलांसहित शहाणी माणसं पतंग उडविताना दिसली. होय, सण आहे ना, उडवलाच पाहिजे. वर्षातून एकदाच येतो हा सण, त्यामुळे कोणी कितीही आवाहन केलं तरी आपण नाहीच ऐकायचं, अशा मानसिकतेचे आहोत आपण. त्यामुळे कोणत्याही सणाचं खरं स्वरूप, त्यामागची भावना आपण लक्ष्यात न घेता फक्त इव्हेंट साजरा करून मोकळे होतो. किती पाखरांचा जीव जात असेल, याचा जराही अंदाज न घेता फक्त पतंग उडविला म्हणजे संक्रांत साजरी होते इतकंच वाटतं आपल्याला. Facebook  आणि Whatsaap वर तर तीळगुळाचा पाऊसच पडत गेला. म्हणजे या एका दिवसापुरती सगळी माणसं इतकी गोड झाली की आता यापुढे भांडणं, खून, हाणामाऱ्या अशा बातम्याच ऐकू येणार नाहीत असं भासलं. थोडक्यात काय तर we just gone through protocols...बाकी या उत्सवाचं खरं स्वरूप काय आहे, याचं आपल्याला काहीच घेणं नाही.

       मी लहान असताना वडिलांनी एक पुस्तक वाचायला दिल्याचं आठवतं – ‘संस्कृती पूजन’ त्या पुस्तकात सगळ्या सण-उत्सवांची इत्यंभूत माहिती दिली होती. मी सुमारे वीस एक वर्षापूर्वी ते वाचलं असल्याने सगळंच आठवत असेल असं नाही. पण महत्वाचं ते मात्र मनात रुजलं गेलं आहे. म्हणनच कदाचित मी जरा विक्षिप्त आहे. whatsaap वर मी कोनालाच  शुभेच्छा देत नाही. अगदी रिप्लायसुद्धा नाही. कारण इतके मेसेज आलेले असतात आणि तेही फक्त forwarded. म्हणजे त्यांना रिप्लाय देण्यात काहीच रस उरत नाही. जे मनापासून वाटत नाही ते मी करतच नाही. मग ‘तीळ गुळ घ्या, गोड गोड बोला’ हेही मला आता पटेनासं झालं. कारण माणसं इतकी गोड बोलतात की संशय वाटू लागतो. ‘गोड असावं, पण फक्त गोड बोलू नये’ असं माझं वैयक्तिक मत आहे. पण ते काहीही असलं तरी आपल्या आजच्या भाषेत सांगायचं सांगायचं तर एका अर्थाने कालचा दिवस एकमेकांना ‘सॉरी’ म्हणण्याचा होता. वर्षभर अनेकदा आपण कळत न काळात एकमेकांची मने दुखावतो. दैनंदिन जीवनात सोबत जगताना किंवा ऑफिसमध्ये सहकारी म्हणून सोबत काम करतानाही आपण थोडेफार नाराज होतोच एकमेकांवर. त्यासाठी सगळं विसरून या दिवशी पुन्हा नव्याने सुरुवात करयची असते. पण ते केवळ formality (औपचारिकता) म्हणून नाही तर मनापासून माफ करायचं असतं. पुरुषांनी, लहान मुलांनी देखील एकमेकांना आलिंगन देत स्नेह वृद्धिंगत होण्यासाठी जवळीक निर्माण करायची असते. हळदी कुंकवाचे निमित्त असले तरी बायकांच्यासुद्धा एकमेकींशी वर्षभर झालेल्या कुरबुरी विसरून त्यांनी माफ करायचं असतं. या दिवशी भेट म्हणून महिला एकमेकींना काही वस्तू देतात (वाण) ती सुद्धा याच अर्थाने सुरु केलेली प्रथा आहे. एकंदरीत सगळ्यांचा स्नेह वाढवा, मनात साचलेले द्वेष नाहीसे व्हावे म्हणून हा सण साजरा केला जातो, फक्त पतंग उडवायला मिळतो म्हणून नव्हेच ! खरं म्हणजे माझा विरोध पतंगाला नसून मांजा सारख्या क्रूर धाग्याला आहे. जो कोणाला जोडण्या ऐवजी तोडण्याचं काम करतो. त्यासाठी साधा धागा वापरला तर या खेळाची मौजदेखील प्रचंड आनंद देते. कोणालाही न दुखावता उंचावर जाणारा पतंद हे माणसाच्या जगण्यात घेतल्या जाणाऱ्या भरारीचं प्रतिक आहे. पण पक्षी, प्राणी आणि आपल्यातलीच काहींना जखमी केलं जात असेल तर या उत्सवात ‘गोडवा’ कसला?  काळजी घेतली तरच तोंड गोड होईल...अन जगणंही !   

      मी लेखात नाराजीचा सूर जास्त आळवला आहे, कारण गेली काही वर्षे अशा सणाचं महत्व आपण विसरत चाललो आहोत हे प्रकर्षाने जाणवत आहे. आपल्या संस्कृतीत सुरु झालेल्या काही परंपरा आपल्याला (माझ्या आणि माझ्या नंतरच्या पिढीला) कदाचित रुचत नसतील, त्याचे अर्थ समजत नसतील म्हणून आपण त्याचे संदर्भ शोधले पाहिजे. जुन्या, बुजुर्ग व्यक्तींचा हात धरून त्यांच्याशी याबद्दल चर्चा केल्या पाहिजे. हा ऐवज आपण खरंच विसरत चाललो आहोत का? हा प्रश्न आपण स्वत:ला विचारला पाहिजे. सध्या दुर्दैवाने सगळं उलट होताना दिसतं. आजच बघा – काल ‘तीळ गुळ घ्या, गोड गोड बोला’ असं म्हणणारे माणसं ग्रामपंचायतच्या निवडणुकीत आज विरोधी पक्षात उभे असतील. असो, पण ते राजकारण, त्यातले जय-पराजय आपण तिथेच सोडायला हवेत. ते सोबत घेत जगू लागतो तेव्हा मनातले द्वेष तसेच वाढत जातात. त्यातून सूडबुद्धी जन्म घेत राहते आणि पूर्वग्रह दुषित होतात. राजकारणाच्या बाबतीत गावकुसाच्या गोष्टीइतकचं वातावरण राज्य आणि देश पातळीवर देखील हिंसक होत चाललं आहे. तरुण पोरं ‘काम नाही’ असं म्हणत या हिंसेचा भाग बनत आहेत. बाप एका पक्षात, मुलगा दुसऱ्या पक्षात. दोघेही केवळ कार्यकर्ते म्हणून एकमेकांचे कट्टर विरोधक होतायत आणि आपली खरी नाती विसरून दुसऱ्यासाठी लढतायत. हा इतका झपाट्याने वाढलेला द्वेष एका दिवसात वाटल्या जाणाऱ्या ‘तीळ गुळाने’ कसा नाहीसा होईल?  म्हणूनच मला प्रश्न पडतो – सण-उत्सव येतात जातात, पण या निमित्ताने माणसं खरोखर एकमेकांना माफ करतात का? राजकीय द्वेषातून निर्माण झालेल्या वैमनस्याचे लोळ अनेक माणसांच्या घरापर्यंत जाताना मी पहिली आहेत. त्या घरात असलेल्या निरपराध माणसाचंही जगणं उध्वस्त होताना, होरपळताना मी पाहिलं आहे. इतकंच नाही, हल्ली माणूस ही जमातच फार निष्ठुर होत आहे. माणसं माणसाला सहन होत नाहीयत. कुटुंबात होणारी जरासी कुरबुर सहन होत नाही म्हणून विवाहबाह्य संबंध ठेवण्यावर जावून पोहोचला हा समाज. मग फक्त एक दिवस ‘गोड बोलण्याचे’ हे सगळे बहाणे आणि अट्टहास कशासाठी? खरोखर वर्षातून एकदाच येणाऱ्या दसरा, मकरसंक्रांतीसारख्या अशा सणांच्या निमित्ताने मागचं विसरून पुढे चालता आलं असतं तर अलीकडे उध्वस्त होत चाललेली कितीतरी कुटुंब वाचली असती. इतकंच नाही, पण या देशात अगदी गुन्हेगारीचं प्रमाण देखील शून्य राहिलं असतं ...पण आपण केवळ कागदावर चालतो...We just goes through protocols...!

 

                                                                                    - कृष्णा बेलगांवकर

#Tagline  #advertisement  #Content_writer