Leave a message for Author

If you want to leave a message regarding with any content, your may convey here...

Monday, 10 August 2020

‘जिन हातोंने कत्ल किये...'


रस्त्याच्या बाजूला अलबेल उभ्या असलेल्या सगळ्या झाडांच्या कत्तली करण्याचं प्रशासनाने फर्मान काढलं. ऐन कोरोना संचारबंदीच्या काळात जमावबंदी असतानाही काही तासातच, काही माणसे टोळी टोळीने येवून फडशा पाडू लागलीत या झाडांचा. झाडं बिचारी एकमेकांकडं पाहून मुसमुसून रडली. क्षणार्धात कोसळली...आपल्याच सावलीत लहानाची मोठी झालेली लेकरं आज विजेवरच्या करवती घेवून अंगावर धावून आली...या विवंचनेतच प्राण सोडला बिचार्यांनी. कोरोना’ने मात्र माणसावर मेहेरबानी केली. पंधरा दिवसांची मुदत दिली. नातेवाईकांना व्हिडीओ कॉल करू देले. काहीना सोबत नेलं, काहीना समज देवून सोडून दिलं. माणसांनी मात्र झाडांना कुठलीच सूचना दिली नाही..कुठलाच निर्वाळा नाही की निरोप नाही. बिचाऱ्यांची उन्हात उभी असेलेली कुटुंब जशीच्या तशी आडवी केली...फर्मान निघालंय म्हणे...शहराचं नवनिर्माण करायचं!

 कृष्णा बेलगांवकर I UPDATES   I 10 AUGUST 2020 

        ---------------------------------------------------------------------

      २००६ सालची गोष्ट. मी पहिल्यांदा नगर शहर बघत होतो. निमत्त आकाशवाणीच्या ‘युवामंच’ कार्यक्रमात कवितांबद्दल मुलाखत रेकोर्डीगचं. औरंगाबाद हायवेला ‘गुलमोहोर रोड’लगत असलेल्या स्टॉपला  उतरल्यावर पत्ता विचारत, आकाशवाणीचं टॉवर बघत निघालो. त्याचवेळी रस्त्याच्या बाजूला असलेल्या ‘गुलमोहोरा’च्या अनेक झाडांनी लक्ष वेधून घेतलं. ऐन उन्हाळाच सुरु झाला होता. हिरव्यागार सावल्या रस्त्यावर पसरलेल्या आणि वर पाहिलं तर भरजरी लाल वस्राचं आच्छादन पांघरावं तशी गुलमोहोराची लालबुंद फुलं. क्षणभर आपण कशासाठी आणि कुठे आलो हे विसरूनच गेलो. वाटेवर ठिकठिकाणी पसरलेल्या त्या झाडांच्या सावल्यांनी वाट सोपी केली. एका ठिकाणी झाडाच्याच सावलीत उसाचा गाडा दिसला. रस प्यालो आणि त्याच माणसाला विचारलं आकाशवाणीचं कार्यालय कुठे आहे? त्याने हात करत दाखवलं आणि मी आत आलो.

       तसं पाहिलं तर शहरात अन्य जातीची अनेक झाडे आहेत. पण ‘गुलमोहोर’ त्यातही सगळ्यात जास्त. उष्ण कटिबंध प्रदेशात ऐन वैशाखात फुलणारा हा वृक्ष. सगळी झाडं आपली पानं झाडतात त्याचवेळी हा बिचारा फुलून येतो, आपलं हिरवेपण जपून ठेवतो. खरं पाहिलं तर हे झाड ऑस्ट्रेलिया, अमेरिका आणि युरोप यांसारख्या देशात जास्त प्रमाणात आहे. भारतातही बहुतांश शहरात बर्यापैकी आहेच. पण आपल्या नगर शहरात इतक्या संखेनं ही झाडं केव्हा आणि कशी आली असतील? मी शहरात पहिल्यांदा आलेल्या त्या अगदी सुरुवातीच्या क्षणापासून तर आज कित्येक वर्ष झाली, माझ्या मनात हे कुतूहल दडून आहे. या झाडांनी आपल्या शहराचं सौंदर्य जितकं जपलं तितकाच आपला मोकळा श्वास देखील जपलाय हेही आपल्याला मान्यच करावं लागेल.

       पण मी हे सारं आजच का बोलतोय? नेमकं कारण काय? हा प्रश्न तुम्हाला पडला असणार. पडायलाच हवा. तर हे सारं सांगण्याचं कारण आज हि झाडं फार संकटात आहेत. इतकी की जितकी माणसं व्हेंटीलेटर लावून शेवटच्या श्वासाकडे एकटक बघत होती. पण माणसांना लागण होती कोरोना सारख्या विषाणूची...या झाडांना मात्र माणसांचीच लागण झालीय.

       शहरातल्या अंतर्गत रस्त्यांच्या रुंदीकरणाची कामे प्रशासनाने हाती घेतलीत म्हणे. अन त्यासाठी रस्त्याच्या बाजूला अलबेल उभ्या असलेल्या सगळ्या झाडांच्या कत्तली करण्याचं प्रशासनाने फर्मान काढलं. ऐन कोरोना संचारबंदीच्या काळात जमावबंदी असतानाही काही तासातच, काही माणसे टोळी टोळीने एवून फडशा पाडू लागलीत या झाडांचा. झाडं बिचारी एकमेकांकडं पाहून मुसमुसून रडली. क्षणार्धात कोसळली...आपल्याच सावलीत लहानाची मोठी झालेली लेकरं आज विजेवरच्या करवती घेवून अंगावर धावून आली...या विवंचनेतच प्राण सोडला बिचार्यांनी. कोरोना’ने मात्र माणसावर मेहेरबानी केली. पंधरा दिवसांची मुदत दिली. नातेवाईकांना व्हिडीओ कॉल करू देले. काहीना सोबत नेलं, काहीना समज देवून सोडून दिलं. माणसांनी मात्र झाडांना कुठलीच सूचना दिली नाही..कुठलाच निर्वाळा नाही की निरोप नाही. बिचाऱ्यांची उन्हात उभी असेलेली कुटुंब जशीच्या तशी आडवी केली...फर्मान निघालंय म्हणे...शहराचं नवनिर्माण करायचं!

       मान्य करतो मी. तुमच्या, पालीकेच्या हद्दीत असलेलीच झाडं तोडलीत तुम्ही. पण आज ती झाडं कोसळताना पाहून मनाला प्रचंड यातना झाल्या. मी निश:ब्द उभा राहिलो. फोटो काढले, व्हिडीओ काढले. शेवटचेच. यानंतर पुन्हा कधीतरी उन्हाळा, येईल, वैशाख येईल..फेरीवाले आपले गाडे घेवून नवीन झालेल्या रस्त्याचा कडेला उभे राहतील. काढून टाकलेली अतिक्रमणे पुन्हा तो नवीन रस्ता काबीज करतील. पालिकेचे अधिकारी कारवाई करण्याऐवजी हप्ता घेवून गप्प बसतील...पण ज्या झाडांनी श्वास दिला ती ‘गुलमोहोराची झाडं’ पुन्हा भगवी-लाल आच्छादन डोक्यावर पसरवणार नाहीत. या धुळीत माखलेल्या वाटेवरून जाताना आज पसरलेली साऊली त्या नवीन झालेल्या रस्त्यावर कधीच दिसणार नाही. कारण कोरोना सारख्या डोळ्यांना न दिसणाऱ्या विषाणूवर लस न शोधू शकणारी माणसं आम्ही. एक जग उध्वस्त करून दुसऱ्या जगाचं नवनिर्माण करायला निघालोय.. माणसांवर हल्ले झाले असते तर ? रस्त्यावर गर्दीच गर्दी उतरली असती. पोलिसांच्या गाड्यांनी घेराव घालत संचारबंदी जाहीर केली असती. अज्ञात हल्लेखोरांविरुद्ध गुन्ह्याची नोंदही केली गेली असती.. मात्र झाडांना जाणीव पूर्वक मारलं जातं. कारण...कारण ती सरळ वाढत जातात..रस्त्यावर अतिक्रमण करत नाहीत, ठरवून दिलेल्या जागेवरच वाढत जातात...महत्वाच म्हणजे ती कोणालाही ‘हप्ता’ देत नाहीत. म्हणून ...!

       मी गलबलून गेलो. सहज तो व्हिडीओ, फोटो स्टेट्सला ठेवला. तर दुपारपासून शहरातील वेगवेगळ्या भागातील मित्रांचे मेसेज आलेत – ‘आमच्याही परिसरात हेच होतंय.’ गेल्या वर्षी मुंबईतल्या ‘आरे’ सारख्या वसाहतीभोवतालचं जंगल नाहीस झालं. ते पाहून खूप हळहळलो ना आपण? मग आज आपल्याच अंगणातली झाडं जमीनदोस्त होताना पाहून काहीच नाही का करू शकत आपण? नाही माझा रस्ता दुरुस्तीसाठी विरोध मुळीच नाही. त्यासाठी भोवतालची अतिक्रमणे नक्की हटवा. अनधिकृत बांधलेल्या इमारतीही पाडा. कारण कधी ना कधी माणसं पुन्हा ते अतिक्रमण करणारच आहेत. हे प्रशासनालाही चांगलं माहित आहे. पण वर्षानुवर्षे शहराला मोकळा श्वास देणार्या या झाडांना वाचवून नाही का रस्ता बनू शकत? इतकं मोठं शहर आहे का आपलं? आणि असलं तरीही शहरातील अंतर्गत रस्त्याने अशी कोणती अवजड वाहतूक केली जाते की ज्यासाठी रस्ते इतके रुंद हवे आहेत? आणि याचंही उत्तर असेल तर याचीही काळजी घ्या की गेलेल्या झाडांसारखे त्या जागेवर नवीन रस्ता झाल्यावरही कोणतंच अतिक्रमण होणार नाही. मूळ प्रश्न हाच आहे. इथे काय करू शकतो आपण? जिथे माणसं आपलं ऐकू शकत नाही, तिथे झाडांवर जबरदस्ती का? याबाबतीत पुणेकरांना खरंच सलाम द्यायला हवा. त्यांनी एक समिती स्थापन केली आहे, निसर्ग संवर्धन, पर्यावरणप्रेमी, अभ्यासक आणि काही प्राध्यापक तसेच शास्रज्ञ देखील या समितीचे सदस्त्य आहेत. शहरातलं कुठलंही झाड कुठल्याही कारणास्तव तोडायचं असेल तर अगदी प्रशासनालासुद्धा त्यासाठी या समितीची परवानगी घ्यावी लागते. तिही बहुतांशी नाकारलीच जाते. आपल्याकडे का नाहीय असं ? उलट भरदिवसा असं झाडांच्या कत्तली करण्याचं फर्मान काढलं जातं. आपल्याला रस्ते हवेच आहेत, पण झाडं नकोशी झाली, असं नाहीय ना? त्यामुळे आपलं व्हिजन कुठे चुकत तर नाही ना? याचा विचार करण्याची गरज आहे. आपल्या सिस्टीमचा हाच तर प्रश्न आहे. आजच्या प्रशासनाला रस्ता बनवायचा आहे, त्यासाठी ते झाडे तोडतायत. काही वर्षांपूर्वी या झाडांची लागवड करताना तत्कालीन प्रशासनाचंसुद्धा काहीतरी व्हिजन असेलच ना? आपण फक्त वर्तमानाचाच का विचार करतो? शहरातील काही पर्यावरण, निसर्गप्रेमी व्यक्तींनी याबाबत मार्गदर्शन करायला, पुढे यायला काय हरकत आहे?

                आता मला भीती वाटायला लागलीय. आधीच कोरोनासारख्या विषाणूच्या प्रदुर्भावामुळे अगतिक झालेलं हे शहर झाडांच्या कत्तलीनंतर सगळंच ओकाबोकी दिसू लागलं तर? ऐन लग्नाच्या वयात आलेल्या तरुण पोरीचं टक्कल करावं असंच नाही का वाटणार? हे विद्रूप चित्र पहायचं नसेल तर आपल्याला जागं झालं पाहिजे. कारण इतक्या दिवस या शहराने आपल्याला कवेत घेतलंय, आता आपण त्याला जवळ घ्यावं याची कदाचित ते वाट पाहत असेल....

       या विवंचनेचा शेवट करताना खूप वर्षापूर्वी मीच लिहिलेल्या कवितेच्या ओळी आज मला इथे आठवतायत -

 जिन हतोंने कत्ल किये

उन हातोंनेही इल्झाम लगाये

दिल कुछ सोच रहा था, दिमाग कुछ ओर..

वक्त ने हिसाब पुछा

- ऐसा नवनिर्माण क्यो?

     अर्थात आपण योग्य भूमिका घेतली नाही तर कधी ना कधी ‘वेळ’ याचा हिशेब मागणारच आहे...! तूर्तास हा निर्णय ‘सगळे नगरकर’ तुमच्या स्वाधीन..

 krishnainfo14@gmail.com