Leave a message for Author

If you want to leave a message regarding with any content, your may convey here...

Saturday, 26 February 2022

‘...आवलीसारखी धरती होती, म्हणून...'

 

'नाट्य समीक्षण' : 60 वी महाराष्ट्र राज्य हौशी नाट्य स्पर्धा २०२२ 

नाटक - तुक्याची आवली  
परमेश्वराचा स्पर्श झाला तरीही ‘माणूस’ बनून उदात्त जगता यायला हवं असं निखळ तत्वज्ञान नावातच ओसंडून वाहणार्या संत तुकोबांची कथा आणि गाथा सगळ्यांनाच माहितीय. पण त्यांना जन्मभर साथ देणाऱ्या आवलीबद्दल कोणालाच काहीच माहित नसावं, ही आजवरची शोकांतिकाच ठरते. तुकोबा वैकुंठाला गेले त्यानंतर आवलीचं काय झालं? याबद्दलही कुठे फारसं काही नमूद नाही. ‘60 व्या महाराष्ट्र राज्य हौशी नाट्य स्पर्धांच्या’ निमित्ताने अहमदनगरच्या माउली सभागृहात सादर झालेल्या ‘तुक्याची आवली’ या नाटकाने हीच गोष्ट अधोरेखित केलीय..

-----------------------------------------------------------------

‘तुम्ही नेहमी सुखीच रहाल..’ अशा कोणत्याच करारावर नियतीने सही केली नाहीय ! म्हणून ती तुम्हाला सतत छळत राहते. या पलीकडे नियतीशिवाय कोणीतरी असावं, कदाचित परमेश्वरच ! ही धारणा अलीकडच्या काळात फार कमी होत चाललीय. त्यामुळे तुमच्या-आमच्या जगण्यात अनपेक्षितपणाने काहीतरी घडलंच तर दोष किंवा शिव्या द्यायलाही तितकं हक्कांचं कोणी नाहीय.. हेही ठीक. परंतु वेळ पडलीच तर तुमच्यासाठी या अदृश्य शक्तीलाही शिव्या शाप देणारी एखादी व्यक्ती सोबतीला असावी..तेव्हाच असा एखादा संवाद जन्म घेतो – ‘आधाराला आवलीसारखी धरती होती, म्हणून तुका आकाशाएवढा झाला..’ 

परमेश्वराचा स्पर्श झाला तरीही ‘माणूस’ बनून उदात्त जगता यायला हवं असं निखळ तत्वज्ञान नावातच ओसंडून वाहणार्या संत तुकोबांची कथा आणि गाथा सगळ्यांनाच माहितीय. पण त्यांना जन्मभर साथ देणाऱ्या आवलीबद्दल कोणालाच काहीच माहित नसावं, ही आजवरची शोकांतिकाच ठरते. तुकोबा वैकुंठाला गेले त्यानंतर आवलीचं काय झालं? याबद्दलही कुठे फारसं काही नमूद नाही. ‘60 व्या महाराष्ट्र राज्य हौशी नाट्य स्पर्धांच्या’ निमित्ताने अहमदनगरच्या माउली सभागृहात सादर झालेल्या ‘तुक्याची आवली’ या नाटकाने हीच गोष्ट अधोरेखित केलीय..

यापूर्वी जेव्हा कधी आवली बद्दल कानावर पडलं असेल तेव्हा विठ्ठलाला काळ्या म्हणून हाक मारणारी, त्याचा सतत राग करणारी, त्याला शिव्या शाप देणारी तोंडाने फटकळ असलेली अशीच आवली समोर आली. पण भोळ्या तुकारामावर जन्मभर निस्सीम प्रेम करणारी, आपला कोणताच कसूर नसतानाही वाट्याला आलेल्या दुबळ्या लाचार जगण्याचा स्वीकार करून संकटांशी सामना करणारी..अनेकदा बायको म्हणून हतबल असूनही ‘माय’ असलेली बेडरपणे आयुष्याला सामोरं जाणारी आवली या नाटकातून पहिल्यांदाच पाहायला मिळाली.

नाटकाच्या सुरुवातीला अगदी काही मोजक्या दृशांतून आवलीचं बालपण दाखवलंय. त्यानंतर तिचं तुकोबाशी झालेलं लग्न आणि नंतर आयुष्यभर तिने अनुभवलेली फरपट या नाटकातून प्रचंड ताकदीने सादर केलीय. कधीही न पाहिलेली, ऐकलेली आवली साकारणं सोपं नव्हतंच. ते जितकं महत्वाचं तितकंच जबाबदारीचंही होतं. म्हणून केवळ आवलीच्या प्रतीक्षेत तब्बल चार वर्षे या संहितेने प्रवास केला आणि शेवटी आश्विनी अंचवले या तरुणीने ही भूमिका यशस्वी पार पाडली. कधीही न विसरणारी आवली रसिकांसमोर उभी केली..जागवली..नव्हे पुन्हा संत तुकोबांचा तो काळ समोर उभा केला. तुकोबा साकारणारे संकेत शहा देखील असेच शांत, संयमी आणि सरळ स्वभाव असलेला कलाकार. ही व्यक्तिरेखा साकारण्यासाठी त्यांनी घेतलेले कष्ट जाणवत नसले तरी, त्यांची अभंग गायणाची पद्धत, विठ्ठल भेटीसाठी होत असेलेली व्याकुळता..आवलीच्या प्रत्येक प्रश्नावर फक्त ‘पांडुरंग’ म्हणून ठरलेलं उत्तर....असे तुकोबा साकारताना संकेत यांनी या पात्रात जीव ओतूल्याचं दिसून येतं. याशिवाय भाग्यश्री आंधळे आणि सौमित्र लोळगे यांनी तुकोबांच्या लेकरांच्या भूमिका लिलया साकारल्या. याबरोबरच पंढरीनाथ या व्यक्तिरेखेतून क्षितीज कंठाली यांनी कमीत कमी वेळेत ‘पांडुरंगाचं’ दर्शन घडवलंय..

सहकलाकार म्हणून इतर व्यक्तिरेखेत मृणाल कुलकर्णी, प्रतीक्षा वेळापुरे, अनुष्का क्षीरसागर, सचिन शिंगटे, किरण गानबोटे, पल्लवी दिवटे, शुभम निर्मळ, चैताली बडे, युक्त ठुबे, विनोद गरुड, गौरव ठिपसे, माहीर कुलकर्णी, वैभव तागड, साई चासकर या पात्रांनीही काहीच कसूर ठेवला नाही.

  • नाटक - तुक्याची आवली (महाराष्ट्र राज्य हौशी नाट्य स्पर्धा,२०२२) 

       नाटक सुरु होतं, पुढे पुढे सरकत जातं...आवलीचं ‘पांडुरंगावर’ रागावणं जितकं मिश्कीलपणानं हशा आणि टाळ्या घेवून जातं तितकंच तिचं तिचं तुकोबावर असलेलं निखळ प्रेम रसिकांना भावूक सुद्धा करतं. नियतीने दिलेले पांग कोणाला चुकलेत का ? असा स्वत:लाच सवाल करत जगणारी आवली वारंवार आपल्याला खिन्न करते. भरल्या घरात सारी सुखं, ऐश्वर्य पायाशी लोळण घेत असताना ऐनवेळी पडलेला दुष्काळ, त्यातून झालेली वाताहत, माणसं जागविण्यासाठी घरातलं होतं नव्हतं सगळं जगाला वाटून रिकामा झालेला तुकोबा..त्याला सावरू पाहणारी त्याची सहचारिणी आवली, त्याची तान्हेली लेकरं, दम्याच्या त्रासाला वैतागून अंथरुणाला खिळून पडलेली नंतर तशीच मरून गेलेली तुकोबाची पहिली बायको..अशा कित्येक गोष्टी प्रत्यक्षात, चित्र रूपाने न दाखवताही त्यांना मूर्त रूप देवून दिग्दर्शक संजय लोळगे यांनी या नाटकाची उंची गाठलीय. नाट्य-लेखक गिरीश जुन्नरे यांनी केवळ आवलीच्या पात्राला समोर ठेवून लिहिलेली संहिता आणि त्यातले भिडणारे संवाद नाटक संपल्यानंतरही रसिकांच्या मनात रेंगाळत राहतात. नाटकाच्या उत्तरार्धात अगदी शेवटच्या दृश्यात दाखवलेली ‘तुकोबा-आवलीची’ पांडुरंगाशी होणारी भेट संपूर्ण नाटक पाहून खिन्न झालेल्या रसिक मनाला चैतन्य देवून जाते....

सुदर्शन कुलकर्णी यांनी दिलेलं उत्तम संगीत, भाग्यश्री आंधळे यांची प्रकाश योजना, नाना मोरे यांची रंगमंच व्यवस्था, युक्त ठुबे यांची वेशभूषा.. या नाटकाच्या अत्यंत जमेची बाजू आहेत. या सगळ्या बाबी महत्वाच्या असल्या तरी काकणभर का होईना चैताली बर्डे यांनी साकारलेल्या सुंदर नेपथ्य कलेसाठी विशेष दाद द्यावी वाटते.
एकूणच असं वाटतं की, या नाटकाचे प्रयोग खेडोपाडी, सांप्रदायिक वाटेवर होत राहोत ..तुकोबा इतकंच आवलीचं जीवनही सर्वाना उमगत जावो या असं वाटतं..!

  •           कृष्णा बेलगांवकर, ९८६०६७०१०६ 


    

 

No comments: